आळशी कावळा

Posted by मधुरा on 1:29 AM

            लहान मुलांनी गोष्टी साठी हट्ट केला की विचार करावा लागतो कोणती गोष्ट सांगावी.. त्यांचा हट्ट पण मोडवत नाही! मी पण लहानपणी खुप गोष्टी ऐकल्या. त्या पैकीच काही गोष्टी मी इथे लिहिणार आहे. बघा लहानपण ताजं होतं का...
          आजची पहिली गोष्ट : आळशी कावळा
          एक चिमणी आणि एक कावळा लहानपणा पासून  खुप चांगले मित्र असतात. पण कावळा असतो खुप आळशी! त्याला फ़क्त खाणे, मस्ती करणे आणि झोपणे इतकच माहिती असत. पण चिमणी खुप समजुतदार, हुशार असते.
          कावळा आणि चिमणी दोघं मिळून ठरवतात की आपण आपल्या धान्याची सोय करावी. त्यासाठी दोघंही शेती करावी असे ठरवतात.चिमणी कावळ्याला म्हणते, " शेती करायची म्हणजे आपल्याला आधी जमीन शोधावी लागेल. आपण असं करू, उद्या सकाळी जाउन जमीन बघून येऊ."
कावळा हो म्हणतो.
          दुसऱ्या दिवशी चिमणी लवकर उठून तयार होते आणि कावळ्याकडे जाते. पाहते तर तो झोपलेलाच! चिमणी कावळ्याला आवाज देते. पण कावळा कसला उठतोय! तो म्हणतो चिमणीला, " अगं आज न माझी तब्येत ठीक वाटत नाही. तूच जाउन येतेस का शेती बघायला?" चिमणीला खरंच वाटलं! ती एकटीच जाते आणि शेतीसाठी जमीन बघून येते. आणि आल्यावर कावळ्याला सांगते, " मी शेतीसाठी जमीन बघून आली बरं.. छान आहे जमीन. जास्त दूर नाही आहे. आपण उद्या पासून शेती सुरु करू." कावळा हो म्हणतो.
          दुसऱ्या दिवशी चिमणी पुन्हा तयार होउन कावळ्याकडे जाते.बघते तर कावळा कुठे तरी बाहेर निघालेला! कावळा म्हणतो, "अग चिमणे आज मला खुप महत्वाचे काम आहे.. आज तू एकटीच जातेस का? मी उद्या नक्की येइल.." आणि निघून जातो.. चिमणी आपली जाते शेतात. दिवसभर काम करते. शेत नांगरते, स्वच्छ करते आणि संध्याकाळी घरी जाताना कावळ्याला सांगते, " आज मी शेत नांगरले बरं का.. उद्या आपल्याला पेरणी करायची आहे."
          दुसऱ्या दिवशी सकाळी पाहते तर कावळा मित्रासोबत खेळत होता. चिमणीला वाटले आज हा नक्की शेतावर येणार. तर कावळा म्हणतो, " तू हो पुढे.. मी थोडा वेळ खेळून लगेच येतो शेतावर." चिमणी जाते. आज तिला पेरणी करायची असते. दिवसभर काम करून थकून जाते. पण कावळा काही येत नाही.
          असेच काही दिवस जातात... चिमणी रोज शेतात जाउन काम करते. कावळा मात्र रोज काही ना काही कारण सांगुन जायला टाळतो. शेतातले पीक छान उंच वाढतात. भरगोस पीक येतं. आणि चिमणी कावळ्याला सांगते, " आपल्या शेतात खुप छान पीक आले आहे. आपल्याला आता पिकांची कापणी करायची आहे. येतोस का उद्या कापणी करायला?" कावळा म्हणतो, " हो हो.. नक्की येतो." पण नेहमी प्रमाणे कावळा काही जात नाही.  ती एकटीच कापणी करते. संध्याकाळी कावळा चिमणीला म्हणतो, " अग मी आज काही येऊ शकलो नाही. पण उद्या आपण जाऊ आणि आपला आपला हिस्सा आपण वाटुन घेऊ." चिमणीला राग येतो. आणि विचार करते या आळशी कावळ्याला अद्दल घडवली पाहीजे..
चिमणी एक युक्ति करते...
ती कावळ्याला म्हणते, " अरे अजुन थोड़े काम बाकी आहे. तू असं कर.. उद्या नको येउस .परवा ये. तोवर मी सगळं काम करते. मग आपण आपले हिस्से वाटुन घेऊ."
          ठरलेल्या दिवशी कावळा सकाळी सकाळी तयार होतो. तो शेतावर जाउन आपला हिस्सा घेण्यासाठी आतूर झालेला असतो! चिमणी त्याच्या घरी येते तेव्हा म्हणतो, " किती उशीर करतेस ग.. मी कधीचा तयार बसलोय!"
चिमणी त्याला घेउन शेतावर जायला निघते. आतूर झालेला कावळा चिमणीला विचारतो, " अजुन किती लांब आहे ग शेत? मी थकलो आता.." चिमणी सांगते, " अरे अगदी जवळ आलो आहोत आपण शेताच्या. अजुन २ शेत गेले ना की नंतर आपलेच शेत आहे."
           जसे जसे ते दोघे शेताजवळ जातात तसं कावळ्याला दूर शेतावर धान्याचे दोन ढिग दिसतात. एक मोठा आणि एक छोटा. चिमणी सांगते, " ते दोन ढिग दिसत आहेत ना तेच आपले शेत." कावला म्हणतो, " चिमणे, मी तुझ्या पेक्षा मोठा आहे ना मग मोठा ढिग माझा.. आणि तू लहान आहेस ना म्हणून छोटा ढिग तुझा." चिमणी हसते आणि म्हणते, "ठीक आहे." हे ऐकून कावळा एकदम खुश होतो.. कधी शेतावर पोहोचतो असं होतं त्याला! तो वेगात उडत जातो आणि मोठा ढिग जवळ येताच
दाणे खाण्यासाठी त्यावर जाउन बसतो. पण तो ढिग धान्याचा नसतोच! तो असतो सालांचा! आणि छोटा ढिग असतो धान्न्याचा! सालांच्या ढिगावर बसताच कावळ्याचा तोल जातो. त्याला लक्षात येतं की तो कुठे तरी खाली पडतोय! कावळा वर उडण्याचा खुप प्रयत्न करतो. पण त्याला तिथून निघता येत नाही. खाली गेल्यावर त्याला कळतं की त्याला तिथून उड़ताच नाही येत आहे! तो आजुबाजुला पाहतो. तर तिथे धान्य नसतच! ते तर धान्न्याचे साल असतात! कावळा चिमणीला आवाज देतो. म्हणतो, " चिमणे मला सोडव यातून.. इथे कसा फसलो मी? आणि इथे तर धान्यच नाही आहे! मला खुप भूक लागली आहे ग.. मला इथून बाहेर काढ..."
          चिमणी त्या ढिगाजवळ येते आणि कावळ्याला म्हणते, " मी इतके दिवस तुला शेतावर बोलावते आहे.. तेव्हा आळशीपणा केलास तू! काम करायला नाही आलास.. आणि आज हिस्सा घ्यायला आला? सगळी मेहनत मी केली. आळस सोडून आला असतास तर तुला आज छान खायला मिळाले असते.. तू मेहनत केली नाहीस म्हणून तुला धान्न्याचे साल मिळाले फ़क्त.."

"प्रत्येकाला चुकीची शिक्षा मिळतेच...."